Sunday, September 13, 2009

फूल ना फुलाची पाकळी


शुद्धी हा फुलांच्या सुगंधाचा पहिला उपयोग. सर्व रोगांच्या उत्पत्तीचे कारण मन असते व त्यामुळे मन शुद्ध, सात्त्विक व प्रसन्न झाले तर रोगपरिहार आपसूक होईल, यात काही संशय नाही.

परमेश्‍वराची पूजा करायची म्हटली, कोणालाही मान द्यायचा म्हटला, कोणाबद्दल आदर दाखवायचा म्हटला, तर कमीत कमी आवश्‍यकता असते फुलाची. "फूल ना फुलाची पाकळी म्हणून मी अमुक तमुक देत आहे,' असा वाक्‍प्रयोगही रूढ आहे. मुळात फूल अर्पण करायचे असते. प्रत्येक फुलाचा काहीतरी उपयोग असतोच. फक्‍त एकच फूल असे आहे, की जे दिले असता मनुष्य खजील होतो व ते फूल म्हणजे "एप्रिल फूल'.

माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभो।

हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्‌ ।

पूजा म्हटली की फूल आवश्‍यक असतेच. हॉस्पिटलमध्ये एखादा आजारी मनुष्य असल्यास फुलांचा गुच्छ नेला जातो. कुणाचा वाढदिवस असेल त्याला पुष्पगुच्छ देतो. मंचावर असलेल्या वक्‍त्याला वा मंचावर एखाद्याचा सत्कार करायचा झाल्यास पुष्पगुच्छ देतो. त्यामुळे पुष्पगुच्छ देणे, हा त्या व्यक्‍तीचा सन्मान असतो. फूल हे सर्वांत महत्त्वाचे. त्याबरोबरीने पुष्कळदा श्रीफळ, शाल, पैसे, भेटवस्तू वगैरे काही दिले जाते. प्रत्येक वेळी पुष्परचना केलेला गुच्छच हवा, मोठा हारच हवा, वा चार फुले हवीत असे नसते, तर एका फुलानेही काम होते.

परमेश्‍वराची पूजा करताना त्याला स्नान घालणे, चंदन, हळद-कुंकू अर्पण करणे वगैरे उपचार करायचे असतील तरी पूजेत फुलाचा मान पहिला असतो. ज्या वेळी इतर कोणतेही उपचार करायचे नसतील तेव्हा एक फूल वाहून नमस्कार केला जातो. असा आहे फुलांचा महिमा.

पुष्प म्हणजे "फूल' हा निसर्गातील एक चमत्कार आहे. बागेत खूप निगा करून वाढवलेल्या झाडाला घातलेले असते नकोसे वाटणारे शेणखत, गांडूळखत वगैरे कुठले तरी खत व पाणी. अशा बागेतल्या झाडाला किंवा कुठल्यातरी वळचणीच्या जागी उगवलेल्या रोपट्याला फूल आल्यावर मात्र लगेच तोडावेसे वाटते. फूल झाडावरच राहिले तरी आसमंतात सुगंध पसरतो. फुलाचा आत्मा सुगंधात असतो. पृथ्वीतत्त्वाचे वास्तव्य सुगंधात असल्यामुळे जणू काही झाडाला दिलेली माती, शेणखत या सर्व माध्यमांतील परमेश्‍वरी अंश सुगंध आहे व ते सुगंधाचे कण बाहेर खेचून काढण्याचे काम झाड करते व परमेश्‍वराचा वास फुलाच्या रूपाने प्रकट करते. म्हणून फुलाला एवढे महत्त्व आहे. शेजारी शेजारी दोन फुटांवर लावलेल्या दोन रोपट्यांना जेव्हा वेगवेगळ्या वासाची, वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या वजनाची फुले येतात तेव्हा आपले डोके चक्रावून जाते. प्रत्येक फूल हा सृजनाचा अप्रतिम आविष्कार असतो. आपल्याला निसर्गाचा हा चमत्कार असंख्य रूपात पाहता येतो. फुले पाहताना "देता अनंत हस्ते किती घेशील दो कराने' असे जे काही म्हणतात ते अगदी खरे वाटते. अशी विविधरंगी फुले पाहिली की "तेथे कर माझे जुळती' असे शब्द आपसूक ओठांवर येतात व परमेश्‍वराला वंदन करावेसे वाटते.

दृष्टीला सुख होते हा फुलाचा पहिला उपयोग. आपल्या आसपासच्या झेंडूच्या बागा, गुलाबाच्या बागा, ऍमस्टरडॅमला ट्युलिपच्या बहरलेल्या बागा पाहिल्या की मन मोहरून उठते. आसमंतात भरून वाहिलेला सुगंध, पारिजातकाच्या झाडावर फुललेली असंख्य फुले व जमिनीवर पडलेला असंख्य फुलांचा गालिचा पाहिला की स्वर्गसुखाचा अनुभव येतो.

आजच्या ताणतणावाने भरलेल्या व सतत नुसत्या सोयी पाहणाऱ्या लोकांना बिनवासाच्या, कडक दांड्याच्या, अनेक दिवस टिकणाऱ्या गुलाबांचे आकर्षण वाटते व अशी फुले भेट देण्यासाठी उपयोगात आणणाऱ्यांचे प्रमाण खूप मोठे आहे; पण यामागे साधतो नुसता व्यवहार.

निसर्गातील अनेकविध प्रकारच्या नैसर्गिक फुलांचा उपयोग नुसते आरोग्यच नव्हे, तर पूर्ण जीवन सुखी करण्यासाठी अनंत प्रकारे होऊ शकतो. घराच्या बागेत असलेल्या वेलींवरच्या फुलांचा सुगंध आसमंतात भरून राहिला असता मनात दुष्ट विचार येऊच शकत नाहीत. मनःशुद्धी हा फुलांच्या सुगंधाचा पहिला उपयोग. सर्व रोगांच्या उत्पत्तीचे कारण मन असते व त्यामुळे मन शुद्ध, सात्त्विक व प्रसन्न झाले तर रोगपरिहार आपसूक होईल, यात काही संशय नाही.

प्रत्येकाचा काही ना काही उपयोग असतो. आम्ही मुले लहान असताना रंगपंचमीच्या आधी काही दिवस पळसाची फुले जमवत असू. आमचे वडील ती फुले पाण्यात उकळवत असत व त्यापासून तयार झालेल्या सुंदर केशरी-पिवळ्या रंगाने आम्ही रंगपंचमी खेळत असू. अंगावर असा रंग पडल्याने पलाशपुष्पाचा उपयोग आपसूक होत असे आणि आजकालच्या रासायनिक रंगांनी जे नुकसान होते ते अनायासेच टळत असे. सध्या मिळणारे असंख्य प्रकारचे रासायनिक रंग वापरून रंगपंचमी खेळल्यास कसा त्रास होतो, हे वेगळे सांगायची आवश्‍यकता नाही.

दसरा, नवरात्र म्हटले की दारावर आंब्याची पाने व झेंडूची फुले यांचे तोरण हमखास लागले जाते. असे तोरण दारात लावल्यावर कुठल्या व्हायरसची किंवा कुठल्या दुष्ट शक्‍तीची घरात शिरण्याची बिशाद आहे? व्हायरस व दुष्ट शक्‍तींना बाहेर थोपविण्याचे काम अशा आंब्याच्या पानाच्या व झेंडूच्या फुलाच्या वासाने होते.

फुलांचा नाजूकपणा आपल्याला एखाद्या नाजूक प्रकृतीच्या व्यक्‍तीशी वा नाजूक गोष्टीशी कसे वागावे, हे शिकवतो.

फुलांचे औषधात तर अनेक उपयोग आहेत. फुलांच्या सुगंधाने मधमाश्‍या फुलाकडे आकर्षित होतात व त्या मध तर तयार करतातच; पण बरोबरीने झाडाच्या पुनरुत्पत्तीच्या कार्याला हातभार लावतात.

कमळाचे औषधी उपयोग खूप आहेत. पांढरे, लाल, निळे अशी अनेक रंगांची कमळे पाण्यात वा दलदलीत उगवतात. या सगळ्यांचे औषधी उपयोग वेगवेगळे असतात. एवढेच नाही, तर आपल्या शरीरातही सहा कमळे उमलत असतात व त्यांना चक्र अशी संज्ञा दिलेली असली, तरी त्यांचे अस्तित्व कमळाप्रमाणेच उपयोगी ठरते. अनेक देवतांना, त्यातही श्रीगणेशाला कमळ अतिशय प्रिय आहे. लक्ष्मी तर जणू कमळातूनच बाहेर येते व कमळावरच विराजमान असते. कुठल्याही देवतेला कमळपुष्पाचे आसन दिले तर त्याहून मोठे आसन नाही.

कमळ महत्त्वाचे आहे, असे म्हणताना गुलाबाचे महत्त्व कमी होत नाही. पारिजातक, जाई, जुई, चमेली, सायली, सोनचाफा ही फुलेही तेवढीच उपयोगाची असतात. जास्वंदीच्या फुलाला खास सुगंध नसला तरी आकार व या फुलाचा मनमोकळेपणा सर्वांना आकर्षित करतो. लाल व पांढऱ्या जास्वंदीचे आयुर्वेदात उपयोग आढळतात. जास्वंदीची फुले असंख्य रंगांची आढळतात.

आयुर्वेदात सांगितलेली आसवे तयार करताना, काढे आंबवण्यासाठी (फर्मेंटेशनसाठी) फुलांचाच उपयोग केलेला असतो. अशी फुलाच्या मदतीने बनविलेली आसवेच खरी गुणकारी ठरतात. यीस्ट टाकून तयार केलेले आसव तेवढे परिणामकारक ठरत नाही.

हिरवा चाफा, कवठी चाफा यांचेही सुगंध मनमोहक असतात. रातराणीचा वास तर नाग व सर्पांनाही आकर्षित करतो, असे म्हणतात.

देशपरत्वे फुले बदलतात. हाय-वेच्या मध्ये लावलेली कण्हेरीची झाडे जशी भारतात दिसतात तशी इटलीतही दिसतात. लाल फुलांची व पांढऱ्या फुलांची, अशा कण्हेरीच्या दोन जाती असतात. आयुर्वेदाने कण्हेरीच्या फुलांचाही उपयोग सांगितलेला आहे.

धोत्र्यासारख्या झाडालाही फुले येतात. पांढरा धोत्रा व काळा धोत्रा या दोन्हींच्या फुलांचा वापर आयुर्वेदात केलेला दिसतो.

स्त्रिया फुले डोक्‍यात घालतात. सुवर्णाचे फूल डोक्‍यात घातले जात असले व स्त्री सुवर्णाचे फूल घातल्याने अधिक प्रसन्न होत असली, तरी सौंदर्य खरी नैसर्गिक फुले डोक्‍यात घालण्यानेच खुलते.

देवाला हजार, लाख फुले वाहण्याचे संकल्पही केले जातात. ज्या फुलांचा सडा पडतो अशी फुले झाडाखाली साफ-सफाई करून सारवलेल्या जमिनीवर घ्यावी, असे म्हणतात.

जाई, जुई, मोगरा ही संध्याकाळी उमलणारी फुले स्त्रियांना अतिशय प्रिय असतात. ही फुले वातावरण धुंद करायला मदत करतात.

ंफुलांचे आकारही वैविध्यपूर्ण असतात. काही फुलांना त्याच्या आकारावरूनही नाव दिलेले दिसते उदा. गायीच्या कानासारखे गोकर्ण. कैलासपतीच्या फुलाच्या खालच्या भागाची रचना महादेवाची पिंडी असल्यासारखा असतो व शेषनागाने पिंडीवर फणा धरून ठेवली आहे अशा आकारात पाकळ्यांची रचना झालेली असते. या अलौकिक रचनेवरून फुलाचे नाव सार्थक झालेले दिसते. या फुलाला अप्रतिम सुगंध असतो.

गुलाबाचे फूल प्रेमाचे प्रतीक मानले जाते. काही फुले पाण्यात उकळून त्याचा वाफारा श्‍वसनरोगांसाठी उपयोगी असतो.

ज्या फुलांपासून पुढे फळे तयार होतात अशाही फुलांचे सौंदर्य व सुगंध मनमोहक असतात. ऍस्टर, डेलियासारख्या फुलांना वास नसला तरी त्यांचे सौंदर्य काही और असते.

कदंबाची फुले लक्ष्मीला प्रिय असतात व ही चेंडूसारखी गोल गरगरीत असतात व त्याच्या संपूर्ण अंगावर सुयांसारखे असंख्य धागे असतात. या फुलांचा वास खूप दूरवर पसरतो. केवड्याला अप्रतिम सुवास असतो; पण केवडा दिसतो पानासारखा. बाहेरच्या बाजूला टोकदार सुवासिक पाने व आत मधल्या दांड्याला पुंकेसर असतात. केवडा श्रीगणेशाला प्रिय असतो. केवड्यापासून बनविलेले अत्तरही सूक्ष्म असून अत्यंत लोकप्रिय आहे.

सध्या ताजी फुले मिळणे दुरापास्त होत चालले आहे व त्याचे उपयोगही कळो झाले आहेत. बाजारात मिळणारी काही फुले खरी असली तरी ती जोपासताना अशी खते व रसायने वापरली जातात, की ती कृत्रिम वाटतात. आजकाल हलके हलके प्लॅस्टिकची फुले बाजारात येऊ लागली आहेत. प्लॅस्टिकची फुले कितीही हुबेहूब दिसली तरी त्यात ना कोमलता ना सुगंध. काही प्लॅस्टिकची फुले पाहिल्यावर अशीही फुले असतात का, अशीही शंका बऱ्याच वेळा मनात येते. पण इतर देशात फिरत असता तशी नैसर्गिक फुले पाहायला मिळतात व जाणवते की परमेश्‍वराची लीला अगाध आहे व वेगवेगळ्या आकारांची, रंगांची, सुगंधांची फुले पृथ्वीच्या पाठीवर अस्तित्वात आहेत. म्हणून असे वाटते, की "काळा गुलाब वा निळा गुलाब आणून दिल्यास मी लग्न करीन' असे म्हणणारी राजकन्या या पृथ्वीच्या पाठीवर असू शकेल.

डॉ. श्री बालाजी तांबे

No comments:

Post a Comment