Monday, August 3, 2009

जीवनाचा आरोग्यखेळ

खेळामुळे नुसतेच आरोग्य मिळते असे नव्हे, तर खेळकरपणा व आनंदीपणा वाढतो, एक-दुसऱ्याला सहन करण्याची शक्‍ती मिळते, पराजय पत्करण्याची शक्‍ती मिळते; पण सध्या खेळसुद्धा छोटे छोटे करत आणले आहेत.

पूर्वी माणसे शे-पाचशे वर्षे जगत असत. अलीकडे शंभर-सव्वाशे वर्षे जगलेली माणसे आढळतात; पण एकंदरीतच मध्यंतरीच्या काळात मनुष्याची आयुर्मर्यादा खूप कमी झालेली होती. आता आधुनिक काळात पुन्हा आयुर्मर्यादा वाढलेली आहे. पण सध्या मनुष्याचे नुसते अस्तित्व अधिक काळ टिकून राहिलेले दिसते. आयुर्मर्यादा वाढली आहे असे म्हणताना मनुष्य मात्र वार्धक्‍याने पीडित झालेला, स्मृतिरहित, काही काम करता येत नाही असा व परस्वाधीन असलेला दिसला तर काय उपयोग? एकूणच काय, तर सध्या मनुष्याचा आकार व आयुष्यमान दोन्ही कमी झाल्यासारखे दिसते. का कोण जाणे, पण माणसाच्या मनात विचार आला, की सर्व गोष्टी छोट्या छोट्या कराव्यात. त्यामुळे छोटे रेडिओ, मिनी टेलिफोन, मिनी कॅमेरा असे सगळी छोटे छोटे तयार झाले. इथपर्यंत सर्व ठीक होते. परंतु इस्टंट व्यायाम, पटकन वजन उतरवणे, पटकन सिक्‍स पॅक स्नायू तयार करणे, झटकन खाणे, अशा तऱ्हेचे शॉर्ट कट्‌स मारून तयार झालेली प्रकृती आरोग्यदायी किंवा जीवनाला योग्य दिशा देणारी असेल असे वाटत नाही.

जीवनातील महत्त्वाचा विभाग म्हणजे खेळ. जीवन हा शंकर-पार्वतीने मांडलेला सारिपाटाचा खेळ आहे असे म्हणतात. तो जर यशस्वी करायचा असेल, तर माणसाने हसत-खेळत जीवन जगावे व खेळांना महत्त्व द्यावे. आपण म्हणतो, "जरा या लहान मुलाला खेळवणार का?' तेथपासून आपल्या आयुष्यात खेळ सुरू होतात. लहान मूल आपल्याबरोबर खेळते, मोठे होत असताना ते अनेक प्रकारचे खेळ करते, या खेळामुळे नुसतेच आरोग्य मिळते असे नव्हे, तर खेळकरपणा व आनंदीपणा वाढतो, एक-दुसऱ्याला सहन करण्याची शक्‍ती मिळते, पराजय पत्करण्याची शक्‍ती मिळते. पण सध्या खेळसुद्धा छोटे छोटे करत आणले आहेत. पूर्वी पाच दिवस चालणारी क्रिकेटची मॅच सध्या एक दिवसावर आलेली आहे. आता तर केवळ २०-२० म्हणजे फक्‍त प्रत्येक संघाने केवळ २० ओव्हर टाकून मॅच खेळली जाते व तेवढ्यातच प्रेक्षकांनी व खेळाडूंनी आनंद घेणे अपेक्षित असते. यात खेळ किती दिसेल हे माहीत नाही; पण या २०-२० मुळे पैशाचे गणित मात्र खूप मोठ्या आकड्यापर्यंत पोचलेले दिसते. या सर्व टीम्सना विकत घेणारी माणसे खूप पैसे देतात व पैसे कमावतात.

माणसाच्या लहान झालेल्या जीवनाला कुणी तरी विकत घेऊन माणसांना रात्रंदिवस कामाला लावून काही मोजकी माणसे पैसे कमावतात. त्यामुळे गरीब-श्रीमंतांतील दरी वाढत जाते व असे करत करत जीवनाचा खेळ २०-२० ओव्हर्सवर येऊन बसलेला आहे. म्हणजे वयाची चाळिशी गाठेपर्यंतच मनुष्याला रक्‍तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्मृतिविभ्रंश असे नाना तऱ्हेचे रोग त्रास देऊ लागतात. ज्या वेळी जो संघ खेळेल त्याने कुठल्या चुका करू नयेत व कुठल्या चुका कराव्यात, जेणेकरून निदान हा २०-२० ओव्हरचा जीवनाचा खेळ आनंदमय होऊन त्यात जिंकता येईल व पुन्हा पुढच्या चाळीस वर्षांसाठी मनुष्याचे आरोग्य नीट तयार होईल, अशा कल्पना डोक्‍यात धरून साधारणतः अगदी कमीत कमी शब्दांत, कमीत कमी नियमांत सांगायचे म्हटले तरी २० नियम डोळ्यांसमोर दिसत होते. त्यातून २०-२० ओव्हर्सची, २०-२० पाळ्यांची कल्पना आली. कुठले २० नियम खेळातून आउट करतात, कुठले २० नियम पाळले असता जीवन यशस्वी होते व जीवनाची मॅच जिंकता येते, याची एक यादी तयार केली.

पावसात भिजू नये, थंडी-वाऱ्यात बाहेर फिरू नये, उंचावरून उडी मारू नये हे साधारणतः प्रत्येकाला माहितीच असते. व्यसने वगैरेंची साथ धरल्यास आपल्याला जीवनयात्रा अर्ध्यावर संपवावी लागेल याची कल्पना साधारण प्रत्येकाला असते. या गोष्टी टाळल्या तरी सकाळी रोज उशिरा उठणे, प्रकृतीला न मानवणारे अन्न-पाणी सेवन करणे, अतिमैथुन, नेहमी अति उत्तेजित अवस्थेत राहणे, सतत शृंगार वा मैथुनाचा विचार करणे, न पचणारे जडान्न खाणे, व्यसन करणे ही प्रतिष्ठा आहे असे समजून एखाद्या व्यसनाच्या आहारी जाणे, अशा छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये चूक झाल्यास खेळाडू नक्कीच आउट होतो.

निरामय दीर्घायुष्य जगणाऱ्या मंडळींनी काही सोपे सोपे नियम आत्मसात केलेले असतात. लवकर झोपून लवकर उठण्याचा नियम पाळताना ते जीवनामधील कुठल्याच आनंदाला वंचित होत नाहीत. खूप थकवा आला असल्यास सुखशय्येवरसुद्धा झोप नीट लागत नाही. तेव्हा प्रत्येकालाच लवकर निजे, लवकर उठे.... याचे पालन करण्यास काय अडचण असावी?

स्वतःच्या प्रकृतीला मानवेल असे अन्न खाण्यात किंवा सामिष अन्न टाळण्यात काय अडचण असावी? मांसाहार करून आलेल्या ताकदीचा वापर तरी कोठे करणार? खेळाडू, घोडेस्वार, पोलिस, ताकद आवश्‍यक असणारा व्यवसाय करणारी मंडळी सामिष आहार करतील तर ते समजण्यासारखे आहे; पण सरसकट सर्वांनीच मांसाहार करून का म्हणून आयुष्य खराब करून घ्यावे? मेंदूचे विकार वा कर्करोगासारखे आजार असणाऱ्यांनी तर मांसाहार केला असता आपली जीवनयात्रा लहान करण्याचे ठरविलेले दिसते..

सोप्या सोप्या गोष्टींचा अवलंब केल्यास जीवनाची २०-२० ओव्हर्सची मॅच अत्यंत यशस्वीरीत्या पार करून पुन्हा २०-२० ओव्हर्स खेळायची संधी मिळू शकते. मल-मूत्रविसर्जन नीट होणे खूप आवश्‍यक असते व त्याकडे लक्ष देण्यासाठी आधुनिकता वा जुनाट विचार यांचा परिणाम होण्यासारखा नसतो. भरपूर पाणी पिण्याने आरोग्य नीट राहत असले तर भरपूर पाणी पिण्याला प्रत्यवाय कुठला असावा? पाण्याऐवजी रासायनिक द्रव्ये असलेली बाटलीतील एरिएटेड पेये का प्यायची?

तेव्हा २०-२० ची पारी व्यवस्थित पूर्ण करायची असली तर सोपे सोपे नियम पाळणे आवश्‍यक आहे, असे केल्याने जीवनाचा खेळ आनंदाने जगताही येईल.

आयुर्वेद म्हणजे जुन्या लोकांनी, जुन्या वेळेला कुठलेही प्रयोग न करता सिद्ध केलेली विद्या आहे असे डोक्‍यात धरून आयुर्वेदाने सांगितलेल्या सूचना न पाळता व आपण आधुनिक आहोत असे समजून वागले तर जीवनयात्रा नक्कीच लवकर संपेल. क्रिकेटसारख्या खेळातसुद्धा पूर्वीच्या वेळी होऊन गेलेल्या मोठ्या खेळाडूंच्या चुका व कसब, त्यांच्या खेळातील प्रावीण्य यांचा विचार आजही केला जातो. असे असताना या खेळाडूंना जुनाट म्हणता येईल का? त्यांनी तयार केलेल्या खेळाच्या पद्धतीचा व त्यामुळे त्यांनी मिळविलेल्या प्रावीण्याचा अभ्यास करून खेळात सुधारणा करता येईल.

रोग आल्यास औषधे घेतानासुद्धा आधी रोगाची पूर्ण कल्पना करून घेणे आवश्‍यक असते. शरीर व रोग हे एकमेकाचे शत्रू आहेत असे समजण्यास हरकत नाही, रोगसंप्राप्ती झाली असता, दोन्ही बाजूंचे संख्याबल, दोन्ही बाजूंच्या सैनिकांजवळ असलेली आयुधे यांचा विचार न करता लढलेले युद्ध कधीच जिंकले जात नाही. शरीराची व रोगाची संपूर्ण माहिती मिळवून, त्यावर काही घरगुती उपचार करता येतात का ते पाहून त्यानंतर रोग न हटल्यास योग्य औषधे घेऊन रोग समूळ नष्ट करायला काय अडचण असावी?

शत्रू आपल्याला दिसू नये म्हणून डोळ्यावर पट्टी बांधून घेतली वा शत्रू आपल्याला दिसणार नाही याची खबरदारी घेतली तर युद्धात आपण जिंकले जाऊच असे नव्हे, उलट पट्टी बांधून झोपलेल्या मनुष्यावर शत्रू येऊन केव्हा घाला घालेल व गळा कापेल हे समजणारही नाही. रोगावर मुळातून उपचार न करता केवळ लक्षणे मिटवण्यावर भर देऊन डोळ्यांवर पट्टी बांधून बसणे कितपत योग्य आहे?
डॉ. श्री बालाजी तांबे


No comments:

Post a Comment