Sunday, June 28, 2009

आयुर्वेद:कान आणि आवाज

कानाचे काम ऐकणे व शरीराचा तोल राखण्यास मदत करणे आहे. म्हणूनच कानाशी निगडित विकारांमुळे श्रवणदोष उद्‌भवतो आणि कानफडात मारल्यावर माणसाचा तोल डळमळतो!

वैद्यकदृष्ट्या कानाचे तीन भाग पडतातः बहिर्कर्ण, मध्यकर्ण आणि आंतरकर्ण. बहिर्कर्णामध्ये कानाच्या पाळीचा व कानाच्या नळीचा समावेश होतो. कानाच्या पाळीचा उपयोग (हाताने धरून पिळण्याव्यतिरिक्त) बाहेरचा आवाज एकत्र करून तो नळीवाटे आत सोडण्यासाठी होतो. बहुतांशी प्राण्यांमध्ये कानाची पाळी हलवून हे ध्वनिग्रहण केले जाते. माणसांमध्ये मात्र स्वतःच्या इच्छेने कानाची पाळी सहसा हलवता येत नाही. कानाची नळी आधी मागे, मग वर अशी वळत जाते. त्यामुळे जोराच्या आवाजापासून तसेच वाऱ्यापासून कानाच्या पडद्याला संरक्षण मिळते. त्या कॅनॉलमध्ये हजारो वॅक्‍स-ग्लॅण्ड्‌स (मेण-ग्रंथी) असतात. त्या हवेतील धूलिकण पकडतात. वॅक्‍स हे वेळोवेळी पडून जात असते. घट्ट झालेला वॅक्‍स सैल करण्यासाठी कानामध्ये करंगळी घालून हलवावी. वॅक्‍स काढण्यासाठी काडेपेटीतील कापूस लावलेली काडी अथवा इअर बड वापरू नयेत. त्यांचा वापर फक्त कानाची पाळी स्वच्छ करण्यासाठी करावा.

कानाचे मुख्य कार्य हे मध्यकर्ण व बहिर्कर्ण करतात. हे दोन्ही भाग आपल्याला दिसत नाहीत. कारण ते कवटीच्या आत असतात. कानाचा पडदा बहिर्कर्ण व मध्यकर्ण यामध्ये ताणून बसवलेला असतो. पडद्याच्या आतील बाजूस हवेचा दाब कमी झाला तर बाहेरील हवेच्या दाबावामुळे पडदा आतल्या बाजूला फुगू शकतो. तसे झाल्यास तो फाटून त्याला भोक पडण्याचा धोका असतो. ते टाळण्यासाठी मध्य कर्णाची पोकळी बंद-उघड होऊ शकणाऱ्या युस्टेशियन ट्यूबमार्फत घशाला जोडलेली असते. हवेचा समतोल बिघडला की आपण आपोआप आवंढा गिळतो. त्यामुळे युस्टेशियन ट्यूब उघडली जाते आणि घशातली हवा मध्यकर्णात जाते व हवेचा समतोल राखला जातो. विमानप्रवासात हवेच्या दाबामध्ये सतत होणाऱ्या चढउताराचा पडद्यावरील परिणाम टाळण्यासाठी आपल्याला चघळायला गोळ्या देतात. त्यामुळे ट्यूब उघडी राहते व कानाला दडे बसत नाहीत.

मध्यकर्णाच्या मोकळ्या जागेमध्ये तीन छोटीशी हाडे असतात. बोटाच्या चिमटीतही न पकडता येणाऱ्या या तीन नाजूक हाडांची नावे हातोडा, ऐरण आणि रिकीब अशी आहेत. ही तीन हाडे एकमेकांना जोडलेली असतात आणि पडद्यापासून आंतरकर्णापर्यंत ध्वनीची कंपने पोचवण्यासाठी ते "सेतू'चे काम करतात. या सेतूमुळे आवाजाचा अंतर्कर्णावर होणारा परिणाम दहापट मोठा होतो. म्हणूनच कर्णकटू आवाज कानावर पडताच या तीन छोट्या हाडांना जोडलेले स्नायू एकदम घट्ट होतात आणि तो आघात आंतर्कर्णाच्या नाजूक दरवाजावर आदळला जात नाही. पण असे आवाज सारखेच आदळत राहिले तर हे स्नायू कायमच आखडलेले राहतात व त्यांची व्यथा डोकेदुखीच्या रूपाने व्यक्त होते.

आंतर्कर्णामध्ये शंख किंवा गुंडाळलेल्या गोगलगायीच्या आकाराचा कॉक्‍लिआ ध्वनिलहरी ग्रहण करून त्यांच्या विश्‍लेषणाचे काम करून त्यांचे रूपांतर मेंदूकडे जाणाऱ्या चैतन्यलहरींमध्ये करतो. तसेच तीन अर्धवर्तुळाकार कॅनॉल आणि त्याला जोडलेले व्हेस्टिन्यूल यांचे कार्य शरीराच्या स्थिर व चल अवस्थेत तोल सांभाळणे हे असते. कॉक्‍लिआ सरळ केल्यावर त्याच्या एका बाजूला पडद्यावर आलेल्या ध्वनिलहरींची स्पंदने पोचवणारे रिकीबीचे हाड असते. या स्पंदनांमुळे कॉक्‍सिआमधील द्राव हलतो व त्याचा परिणाम होऊन आतील केशपेशी (हेअरसेल्स) हलतात. त्यांचे हलणे त्यांच्याच बुडाशी असणाऱ्या मज्जातंतूंमध्ये चैतन्य निर्माण करते आणि हाच करंट "ऑडिटरी नर्व्ह'मार्फत मेंदूचा आवाज ओळखून त्याचा अर्थ लावणाऱ्या भागाकडे पाठविला जातो.

आवाजाच्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीप्रमाणे आंतर्कर्णातील वेगवेगळ्या केशपेशी उत्तेजित होतात. आवाजाच्या "व्हॉल्यूम'प्रमाणेही त्यांचे प्रतिसाद बदलतात. विशिष्ट केशपेशींच्या हालचालींमुळे नेमक्‍या श्रुतींचे ग्रहण होते. ध्वनीच्या प्रत्येक गुणधर्माप्रमाणे केशपेशींचा प्रतिसाद बदलतो आणि त्यामुळेच आवाजाचे सूक्ष्मातिसूक्ष्म विश्‍लेषण शक्‍य होते. ही विश्‍लेषणाची प्रक्रिया नैसर्गिक असली तरी त्याचे ग्रहण होण्यासाठी व ते स्मृतींच्या रूपात टिकून राहण्यासाठी एकचित्त होऊन दीर्घ काळ श्रवण करणे महत्त्वाचे असते. त्यामुळेच "कान तयार होऊन' कानसेन होता येते. काही थोड्या भाग्यवंतांना अत्यंत अल्पावधीतच हे "स्वरज्ञान' प्राप्त होते. संगीताची उपजत जाण असणे हे त्यामुळे बालवयातच दिसून येते.

ध्वनिप्रदूषणामुळे त्या त्या फ्रिक्‍वेन्सीचे हेअर-सेल्स मरून बहिरेपण येऊ लागते। जन्मतः कर्णबधिर असणाऱ्यांमध्ये कॉक्‍लिआपासून मेंदूकडे संदेश पोचवणारी यंत्रणा निकामी असते. सर्वसाधारणतः बधिरपणामुळे मूकत्व येते. यावरून आवाज निर्माण करण्यासाठी आवाज ऐकण्याचे महत्त्व लक्षात येते.

सौजान्य:ई-सकाळ

आयुर्वेद:बिनमधमाशीचा मधाचा बांबू

चरकसंहिता "पौण्ड्रक' आणि "वंशक' या दोन प्रकारच्या उसांचा उल्लेख करते. पैकी पौण्ड्रक' अधिक श्रेष्ठ दर्जाचा, असेही नोंदविते. उत्तर बंगालमधील प्रदेशाला "पुण्ड्र' देश म्हटले जाई. त्यावरूनच या "ऊस' प्रकाराचे नाव पडले असावे. जैन पद्म पुराणातही याची पुष्टी मिळते. चरकाच्या मते, उसाच्या रसातील अन्यद्रव्ये जितकी काढावीत तितकी शर्करा "शुभ्र' व "शीत' आणि "जड' बनते.

माणसाच्या खाद्यविश्‍वात "गवत'वर्गी वनस्पतींची मातब्बरी उघड आहे. पण धान्य देणाऱ्या तृणांखेरीज आणखी दोन गवतांचे स्थान फार लक्षणीय आहे. ही दोन "अजब आणि अफाट' गवते म्हणजे बांबू आणि "ऊस'. पैकी बांबू खाण्यापेक्षाही अन्य उपयोगांमध्ये अधिक प्रबळ, पण ऊस या पोएसीकुलीन गवताची मोहिनी फार प्राचीन आणि सर्वव्यापी आहे. अडीच-तीन हजार वर्षांपूर्वी आशिया खंडात मोजकेपणी पसरलेल्या या "गवता'ची लागवड आता जवळपास १७०-१७५ देशांमध्ये केली जाते. फार पूर्वी या गवताचे रानटी पूर्वज गियाना बेटांमध्ये आणि भारताच्या काही पूर्व व उत्तर भागामध्ये आढळायचे. साक्‍खारूम एड्यूल आणि साक्‍खारूम ऑफिकिनाकुम या प्रजाती गियाना बेटामध्ये, तर "साक्‍खक्रूम बार्बेर' प्रजातीचा आढळ भारतीय खंडात असे.

परंतु या गवताच्या अंगीचा रस आणि त्यापासून उपजलेली "शर्करा' ही निर्विवादपणे भारतीय उपखंडाची देणगी आहे. गणितातल्या शून्याशी तुलना करण्याजोगते हे योगदान सर्व जगभर दृढावलेले आढळते. जगातल्या अनेक भाषांमधला "साखरे'साठीचा शब्द "शर्करा'पासून निपजला आहे. (तमीळमध्ये साखरेसाठी "अक्कारम्‌' असा शब्द आहे.) उदा.- अरेबिक व फारसी भाषेतला "शकर', जवळपास त्याच उच्चाराचा रशियन "शकर', "लॅटिन स्यूक्र किंवा जर्मन झ्युकर किंवा "खांड', "खंड'चा फारसी "कन्द', इंग्रजीतली कॅंडी, उसापासून साखर निष्पन्न करण्याची कला कधी किती विकसित झाली याचा फक्त ढोबळ अंदाज करता येतो. ऋग्वेदात उसाचा- म्हणजे "इक्षु'चा- उल्लेख नाही; परंतु काही विद्वानांच्या मते, "कुसर' गवत हे उसाचाही निर्देश करणारे असावे. अथर्ववेदामध्ये ऊस चावून खाण्याचा उल्लेख आहे, तसाच यजुर्वेदामध्येही आढळतो. बहुधा भारतातल्या आदिदाक्षिणी लोकांमध्येच उसापासून "शर्करा' बनविण्याचे तंत्र इतर समूहात पसरले, सूत्रकाळाच्या आसपास उसाच्या रसापासून बनणारा "गुड' चांगलाच प्रचलित आणि स्थिरावला असावा. अनेक गृहधर्मकृत्यांत त्याचा वापर आढळतो. पाणिनीमध्ये "गुडा'बरोबर "फाणित' (म्हणजे जुन्या हिंदीतला' राबा', मराठीतली काकवी, आणि शर्करा यांचाही उल्लेख आढळतो. "गुड' या शब्दापासून "गौड'ची व्युत्पत्ती त्याने सुचविली आहे. त्यावरून आजचा बिहार व बंगाल हे त्याचे मूळ ठिकाण असावे. नंतरच्या बुद्धकालीन वाङ्‌मयातही गुडाचा उल्लेख आढळतो. "गुड' ऊर्फ गूळ हेच साखरेचे पहिले रूप. परिणामी, अनेक "धर्मकृत्यां'मध्ये कितीही "शुद्ध' असली तरी साखर नव्हे, तर "गूळ'च आढळतो.

उसांचे बारा प्रकार

चरक संहिता "पौण्ड्रक' आणि "वंशक' या दोन प्रकारच्या उसांचा उल्लेख करते. पैकी पौण्ड्रक' अधिक श्रेष्ठ दर्जाचा, असेही नोंदविते. उत्तर बंगालातील प्रदेशाला "पुण्ड्र' देश म्हटले जाई. त्यावरूनच या "ऊस' प्रकाराचे नाव पडले असावे. जैन पद्‌म पुराणातही याची पुष्टी मिळते. चरकाच्या मते, उसाच्या रसातील अन्य द्रव्ये जितकी काढावी तितकी शर्करा "शुभ्र' व "शीत' आणि "जड' बनते. चरक संहितेनंतर चार शतकांनी घडलेल्या सुश्रुत संहितेमध्ये उसांचे बारा प्रकार नोंदलेले आढळतात. हा भारतखंडातील उसाचा प्रसार आणि प्रसारकाळात उद्‌भवलेला संकर अथवा उत्परिवर्तनाचा द्योतक असावा. त्यातील काही अगोदरच्या प्रकारामधून वेचलेले प्रकारही असावेत. उदा.- "भीरुक' जातीचा ऊस गुणधर्मदृष्ट्या पौण्ड्रक उसासारखाच असतो किंवा "श्‍वेतपोरक उसाचे गुण वंशक उसासारखेच असतात,' ही विधाने उसाच्या वाढीमध्ये फरक असल्याने "ऊस बुडख्याकडे अतिशय गोड, मध्यभागी मधुर आणि शेंड्याकडे व डोळ्यांच्या ठिकाणी किंचित खारट असतो,' असे सुश्रुताने नोंदले आहे.

त्यातली विशेष नोंदण्यासारखी गोष्ट म्हणजे रस काढण्याच्या "यंत्रा'चा त्यात स्पष्ट उल्लेख आहे. घाण्याने काढलेल्या रसांचे गुण चावून खाल्लेल्या "रसा'पेक्षा विभिन्न असतात. घाण्याचा रस अधिक जड, विदाही आणि वाताचा अवरोध करणारा असतो (गुरुर्विंदाही विष्टम्भी यांत्रिकस्तु प्रकीर्तितः). उसाचा रस काढणे ही मोठी किचकट व चिकाटीची प्रक्रिया असते. एकेकाळच्या "उलखलु' या पाटा-वरवंटावर्गी यंत्रामुळे आणि मुबलक मानवी श्रमांमुळेच ते पूर्वी शक्‍य असे. उलुखल हा "उखळ' आणि "कोलू' या दोन्हीशी संबंधित शब्द आहे. त्यानंतर तो रस उकळून "स्वच्छ' करणे याकरिता आता वापरली जाणारी "गंधकक्रिया' तेव्हा उपलब्ध नसावी. आजघडीलादेखील गुऱ्हाळांमध्ये रसाच्या आधणामध्ये मळ साचवून एकवटणाऱ्या वनस्पतींच्या छोट्या फांद्यांचे झुबके चेचून टाकतात. एरवी निरुपयोगी म्हणून हिणविलेले भेंडीचे झाड या कामी मात्र येते! हा साफ केलेला रस "किती साफ' आहे आणि कसा थंड होतो, यावर "गूळ' ते निरनिराळ्या रूपगुणांची साखर, हे रूपांतर अवलंबून असते. "राब' (काकवी), गूळ, भुरा, खांडसर, "खाण्ड' हे शब्द या परिवर्तनाच्या प्रकारानुसार पडले. अगदी साफ स्फटिकीकरणाच्या कडा उमटलेली साखर म्हणजे "खांड'. वस्त्रगाळ करत परातीत सतत हलवत रव्यासारखी होणारी पण मोठ्या करपट गुळी गुठळ्या आढळणारी साखर, माशांची गाभोळी (अंडी) असावीत तसे स्फटिकीकरण झालेली साखर, (त्याला "मत्संडिका शर्करा' म्हणत) अशा अनेकविध अवस्थांतरी तऱ्हा प्रचलित होत्या. चौकोनी दाणेदार घनाकृती स्फटिक ही अगदी अलीकडची रुळलेली हौस. अजूनही इराण, अफगाणिस्तान, मध्य आशिया, अरबस्तान भागामध्ये साखरेचे खांड म्हणजे मोठमोठे खडे विकले- वापरले जातात. ते फोडायचे वेगळे "अडकित्ते'ही असतात.

सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी युरोप-अमेरिकेतील साखरही मुख्यतः अशी "खडकाळ'च असायची. युरोप आणि अमेरिकेला साखरेची मोठी टंचाई होती. (भारत खंडाच्या मानाने फारच!) या "ऊस' गवताने युरोपीय फार चक्रावले, मोहात पडले. अलेक्‍झांडरबरोबर आलेल्या याने मोठ्या आश्‍चर्याने लिहिले आहे, "इथे एक प्रकारचा बांबू असतो. अगदी मधाने पूर्ण भरलेला. पण तरी त्याभोवती एकसुद्धा मधमाशी नसते!'

आयुर्वेद :काळजी मधुमेहाची

'मधू' म्हणजे मधुर किंवा गोड व 'मेह' म्हणजे बहूमूत्रता. म्हणजे ज्या व्यक्तीस वारंवार व मधुर अशी मूत्रप्रवृत्ती होते, त्यास मधुमेह असे म्हणतात. या विकारात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, त्यामुळे रक्त फिल्टर होऊन तयार होणाऱ्या मूत्रातही शर्करेचे प्रमाण आढळते व ते मधुर होते.

मधुमेह किंवा डायबेटिस हा शरीरातील अन्नाशयात तयार होणाऱ्या इन्शुलिनचे प्रमाण कमी झाल्यावर होतो. कारण इन्शुलिनबरोबरच ग्लुकोज प्रत्येक पेशीत जाऊन कामासाठी ऊर्जा निर्माण करते.

जर इन्शुलिन तयारच झाले नाही किंवा कमी प्रमाणात तयार झाले तर ग्लुकोज पेशीमध्ये जाऊच शकत नाही. परिणामी व्यक्तीस थकवा जाणवतो.

काही रुग्णांमध्ये अन्नाशयात इन्शुलिन तयार करणाऱ्या पेशीच नष्ट होतात. त्यामुळे शरीरात इन्शुलिन तयारच होत नाही व मधुमेह होतो, तर काही रुग्णांमध्ये इन्शुलिन तयार होते; परंतु शरीरातील पेशी त्याचा स्वीकार करण्यास तयार नसतात. त्यामुळे ग्लुकोज पेशीकडून वापरले न गेल्याने रक्तातील त्याचे प्रमाण वाढते व डायबेटिस होतो.

शरीरातील अंतःस्रावी ग्रंथीतील विकृती, व्याधिशमत्व प्रणालीतील विकृती किंवा आनुवंशिक विकृतीमुळे डायबेटिस होतो.

1) अन्नाशय ही एक अंतःस्रावी ग्रंथी आहे. त्यात बिघाड झाल्यास डायबेटिस होतो.

2) विशिष्ट प्रकारच्या विषाणूंमुळे शरीरात अशी प्रतियोगी द्रव्ये (Antibodies) तयार होतात, की ही द्रव्ये व्याधी प्रतिकार करण्याऐवजी विशिष्ट पेशीच नष्ट करतात व डायबेटिसमध्ये या विषाणू हल्ल्यात अन्नाशयातील इन्शुलिन तयार करणाऱ्या पेशी नष्ट होतात.

3) आनुवंशिक विकृतीत एका पिढीतून दुसऱ्या पिढीत त्याचे वहन होते. हा एक बीजदोषच आहे.

मधुमेहाचे शरीरावर परिणाम

मधुमेहास Silent Killer असे म्हणतात. कारण यात रक्तातील साखर वाढणे एवढेच जरी व्याधीचे स्वरूप दिसत असले, तरी त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. ही रक्तातील वाढलेली शर्करेची पातळी शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर खूप खोलवर परिणाम करते व तुमचा आरोग्याचा स्तर खालावतो.

वाढलेल्या साखरेचे परिणाम - 1) पचन संस्था, 2) रक्तवह संस्था, 3) त्वचा, 4) अस्थी, 5) श्‍वसन संस्था, 6) प्रजनन संस्था, 7) मूत्रवह संस्था, 8) व्याधिशमत्व प्रणाली या सर्वांवर होतो. म्हणूनच यात योग्य औषधे व पथ्य पाळणे खूप आवश्‍यक असते.

1) यात शरीरातील तसेच त्वचागत जलीय धातू कमी होऊन त्वचा शुष्क होणे, वारंवार तहान लागणे, कांती नष्ट होणे, भेगा पडणे, हे त्वचा विकार उत्पन्न होतात.

2) मधुमेहात रक्तसंवहनात येणारे अडथळे, नर्व्ह डॅमेज, स्थौल्य यामुळे संधिवाताचीही शक्‍यता वाढते.

3) वाढलेल्या शर्करेचे प्रमाण अधिक काळ रक्तात तसेच राहिले तर रक्त फिल्टर करणाऱ्या किडनीचे कार्य व्यवस्थित होत नाही व किडनी निकामी होते.

4) डायबेटिसमध्ये कर्बोदके, प्रथिने व चरबी यांच्या चयापचय प्रक्रियेवर परिणाम झालेला असतो. त्यामुळे त्यात तयार झालेली विषद्रव्य रक्तवाहिन्यांमध्ये संचय पावतात. परिणामी रक्तवाहिन्यांत अडथळा येतो व हृदयविकार किंवा रक्तदाबासारखे आजार ओढावतात.

5) मधुमेहामुळे डोळ्यांतील रेटायना या भागावर असणाऱ्या छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आल्याने अंधुक दिसणे, डोळे दुखणे, जड पडणे अशा दृष्टीशी व डोळ्यांशी निगडित तक्रारी असतात.

6) डायबेटिसमध्ये किडनीवर परिणाम झाल्याने रक्तातील विषद्रव्य बाहेर फेकली जात नाहीत. त्याचा परिणाम मेंदू व यकृतावर होतो, तसेच मेंदूच्या नसांमधील पेशी एकदा नष्ट झाल्या की पुन्हा तयार होत नाहीत व त्याचा पुरवठा असणारा भाग कायमचा विनाश पावतो व मधुमेही रुग्णात हा पेशीनाश लवकर होतो.

म्हणूनच मधुमेही रुग्णाने गाफील न राहता औषधे, व्यायाम, पथ्य, जेवणाच्या वेळा, पायी चालणे या गोष्टी सातत्याने केल्या पाहिजेत.

मधुमेही रुग्णाचा आहार

या रुग्णांचा आहार हेदेखील एक औषधच आहे. मधुमेहींनी औषधाप्रमाणेच आहाराचेही काटेकोर पालन करणे आवश्‍यक आहे.

या रुग्णांचा आहार हा रुग्णाचे वजन, वय, त्याची शारीरिक हालचाल, मधुमेहाचा प्रकार, त्याच्या व्यवसायाचे स्वरूप यावरून ठरवावा.

रुग्णाने रोजच्या आहारात पाळावयाच्या गोष्टी -

1) आहारातील कर्बोदकाचे प्रमाण मर्यादित असावे.

2) रेषायुक्त (फायबर्स) पदार्थ आहारात असावेत.

3) बेकरीचे पदार्थ व फास्ट फूड्‌सचा आहारातील वापर टाळावा.

4) ताजी फळे व भाज्यांचा आहारात वापर असावा.

5) झोपण्यापूर्वी अडीच ते तीन तास आधी जेवण घ्यावे.

6) दोन वेळा भरपेट जेवण्यापेक्षा 3-4 तासांनी थोडाथोडा आहार घ्यावा.

7) आहार हा कमी कॅलरीज असणारा, परंतु परिपूर्ण पोषकांश असणार असावा.

8) प्रत्येक मधुमेही व्यक्तीस एकच आहार नसतो. तसेच तोच तोच आहार खूप दिवस चालू ठेवणेही अपायकारकच. म्हणून आहारात वैविध्य असावे.

9) शक्‍यतो कृत्रिम साखर वापरणे टाळावे.

मधुमेहाचे रिस्क फॅक्‍टर्स व त्याची लक्षणे

रिस्क फॅक्‍टर्स

1) स्थूलता - आवश्‍यक वजनापेक्षा जास्त वजन असल्यास मधुमेहाची शक्‍यता 20% जास्त असते. आवश्‍यक वजनापेक्षा जेवढे जास्त वजन असेल तेवढी मधुमेहाची शक्‍यता वाढत जाते.

2) वय 40 वर्षांनंतर मधुमेहाचा धोका वाढत जातो. चाळिशीनंतर वजन कमी असो किंवा जास्त असो, मधुमेह होण्याचा धोका जास्तच असतो.

3) अन्नाशयास वारंवार येणारी सूज इन्शुलिन तयार करणाऱ्या पेशींवर परिणाम करते व मधुमेहाची शक्‍यता अशा रुग्णांमध्ये वाढते.

4) काही औषधांच्या अधिक सेवनानेही मधुमेह होऊ शकतो. उदा. स्टिरॉईड्‌स. म्हणूनच वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधी उपाययोजना करू नये.

5) गरोदरपणा ः यात मधुमेहाची शक्‍यता असते. परंतु हा मधुमेह तात्पुरता असतो व प्रसूतीनंतर तो बरा होतो.

मधुमेह लक्षणे

1) वारंवार व भरपूर प्रमाणात होणारी मूत्रप्रवृत्ती

2) खूप तहान लागणे, घसा कोरडा पडणे, नाक शुष्क होणे

3) वजन अचानक घटणे किंवा वाढणे

4) सतत थकवा जाणवणे, आळस वाटणे, कामात उत्साह न जाणवणे

5) मळमळ होणे, उलटी, अपचन यांसारखी लक्षणे

6) वारंवार त्वचेचे, मूत्रवह संस्थेचे किंवा स्त्रियांना योनीमार्गाचे विकार होणे

7) स्त्रियांमध्ये श्‍वेतप्रदर, योनीमार्गात कंड अशा तक्रारी.

8) प्रथिने व कर्बोदकाच्या पचनावर परिणाम

9) अंधूक दिसणे, डोळे दुखणे

10) पाय दुखणे, पोटऱ्या ओढणे

वरील लक्षणे दिसत असल्यास किंवा आपण रिस्क फॅक्‍टरमधील कोणत्या फॅक्‍टरमध्ये असू तर सर्वप्रथम रक्तातील शर्करचे प्रमाण तपासून बघावे.

मधुमेह चिकित्सा

आयुर्वेदानुसार याची चिकित्सा 2 प्रकारे करतात. 1) शमन, 2) शोधन चिकित्सा

शमन चिकित्सा - शमन चिकित्सा म्हणजेच औषधी चिकित्सा. यात निरनिराळ्या काष्ठौषधी, रसौषधींचा उपयोग करतात. गुडूची, आवळा, हरिद्रा, त्रिफळा, मुस्ता, मेथ्या तसेच गुग्गुळ कल्प व व्याधीचे बलाबल बघून वसंत कल्प या अशा अनेक कल्पांची उपाययोजना करतात.

शोधन चिकित्सा - शोधन म्हणजे शरीराची शुद्धी. मधुमेही रुग्णात वमन व बस्तीसारख्या शोधन चिकित्सेने शरीराचे उत्तम शोधन होते व व्याधी आटोक्‍यात राहण्यास मदत होते.

आयुर्वेदानुसार प्रमेह हा कफदोषाचा व्याधी सांगितला आहे. त्याची व्याख्या करतानाच "बहुद्रव श्‍लेष्मा' अशी केलेली आहे व कफावर आयुर्वेदात वमन चिकित्सा देतात, तसेच बस्ती चिकित्सेनेही धातूंची शुद्धता होते. त्यातील क्‍लेद नाहीसा होतो. धातूंचे शोधन होते व त्यांचे उत्तम संहनन होते.

म्हणूनच वमन व बस्ती ही चिकित्सा वर्षातून एकदा तरी किंवा व्याधीचे बलाबल बघून करावी.

आजकालच्या प्रचलित औषधाने रक्तातील "शुगर लेव्हल' नियंत्रित राहते; परंतु वजन घटणे, पाय, पोटऱ्या दुखणे, थकवा जाणवणे, पचनातील बिघाड, अंधुक दिसणे या तक्रारी तशाच राहतात.

परंतु आयुर्वेद चिकित्सेने रक्तातील शर्करेचे प्रमाण केवळ नियंत्रित ठेवणे एवढाच उद्देश नसून शरीरात इन्शुलिनचा पेशींचा स्वीकार वाढविणे तसेच अनियंत्रित शर्करेचा जो परिणाम डोळे, त्वचा पचन संस्था, इत्यादी अनेक संस्थांवर झाला आहे, त्याचाही परिणाम हळूहळू नाहीसा करून उत्तम आरोग्याचा दर्जा ठेवणे हे आयुर्वेद चिकित्सेचे मुख्य ध्येय आहे. यात केवळ लाक्षणिक चिकित्सा न देता शरीराचे शोधन करून शरीरातील विषद्रव्य बाहेर काढतात व त्यामुळेच केवळ रक्तातील साखरेचे प्रमाणच नियंत्रित राहते असे नसून, अशा रुग्णांना जाणवणारा थकवा, पाय दुखणे, वजन घटणे, तहान लागणे या तक्रारीही नाहीशा होतात.

आयुर्वेदिक औषधे व्यवस्थित व नीट पथ्य पाळून घेतली तर काही रुग्णांचे इन्शुलिन इंजेक्‍शन बंद होते

सौजन्य:ई-सकाळ

आयुर्वेद: भाज्यांचे आयुर्वेदिक गुण

काही भाज्यांचे आयुर्वेदिक गुण


कोहळा

कुष्माण्डं बृंहणं वृष्यं गुरु पित्तास्रवातनुत्‌ ।

बालं पित्तापहं शीतं मध्यमं कफकारकम्‌ ।।

वृद्धं नातिहिमं स्वादु सक्षारं दीपनं लघु ।

बस्तिशुद्धिकरं चेतो रोगहृत्‌ सर्वदोषजित्‌ ।।

...भावप्रकाश

कोहळा पुष्टिकर, शुक्रधातुपोषक, पित्त व वातदोष कमी करणारा असतो आणि तो रक्‍तदोषातही हितावह असतो. अगदी कोवळा कोहळा पित्तशामक व शीत गुणधर्माचा असतो. मध्यम कोहळा कफ वाढवतो. पिकलेला कोहळा फार थंड नसतो, पचायला हलका असतो, स्वादिष्ट असतो, अग्नी प्रदीप्त करतो, मूत्राशयाची शुद्धी करतो, मानसिक रोग दूर करतो व त्रिदोषांना जिंकतो.

काकडी

कर्कटी शीतला रुक्षा ग्राहिणी मधुरा गुरु ।

रुच्या पित्तहरा सामा पक्वा तृष्णाग्निपित्तकृत्‌ ।।

...भावप्रकाश

काकडी वीर्याने थंड, चवीला गोड, थोडी रुक्ष असते, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, रुचकर असते, कच्ची म्हणजेच कोवळी काकडी पित्तशामक असते, मात्र पिकलेली काकडी पित्त वाढवते व तहान उत्पन्न करते.

तोंडली

बिम्बीफलं स्वादु शीतं गुरु पित्तास्रवातजित्‌ ।

स्तम्भनं लेखनं रुच्यं विबन्धाध्मानकारकम्‌ ।।

...भावप्रकाश

तोंडली चवीला स्वादिष्ट, शीत वीर्याची व पचायला जड असते, मात्र पित्तदोष व कफदोष कमी करते, अतिरिक्‍त चरबी कमी करते, रुचकर असते मात्र थोड्या प्रमाणात गॅसेस व मलावष्टंभ करू शकते.

तोंडलीमुळे बुद्धी कमी होते असे निघंटु रत्नाकरात सांगितले आहे. तसेच जीभ जड असणाऱ्या मुलाला तोंडलीची भाजी देऊ नये असा वृद्धवैद्याधार आहे.

कारले

कारवेल्लं हिमं भेदि लघु तिक्‍तामवातलम्‌ ।

ज्वरपित्तकफास्रघ्नं पाण्डुमेहकृमीन्‌ हरेत्‌ ।।

...भावप्रकाश

कारले वीर्याने शीत असते, मलाचे भेदन करते, पचायला हलके व चवीला कडू असते, पित्तदोष व कफदोष कमी करते, रक्‍तदोष कमी करते, योग्य प्रमाणात घेतल्यास पांडूरोग, प्रमेह व कृमीरोगात हितकर असते. मात्र कारल्याचे सेवन अतिप्रमाणात केल्याने वात वाढताना दिसतो. त्यामुळे भाजी म्हणून केलेला कारल्याचा वापर पुरेसा ठरावा.

टिंडा / ढेमसे

डिण्डिशो रुचिकृद्‌ भेदी पित्तश्‍लेष्मापहः स्मृतः ।

शीतलो वातकृत्‌ रुक्षो मूत्रलश्‍चाश्‍मरीहरः ।।

...भावप्रकाश

टिंडा ही एक पथ्यकर भाजी होय. टिंडा चवीला रुचकर असतो, पित्त तसेच कफदोषाचे शमन करतो, वीर्याने शीत असतो, रुक्ष गुणाचा असल्याने वात वाढवतो, मूत्रप्रवर्तनास मदत करतो व मूतखड्यामध्ये हितकर असतो.

कर्टोली

कर्कोटी मलहृत्‌ कुष्ठहृल्लासारुचिनाशनी ।

श्‍वासकासज्वरान्हन्ति कटुपाका च दीपनी ।।

...भावप्रकाश

कर्टोलीची भाजी मलदोष दूर करते, त्वचारोगात हितकर असते, मळमळ, अरुची, दमा, खोकला, ताप वगैरे त्रासात अतिशय हितकर असते, अग्नी प्रदीप्त करते.

भेंडी

भेंडी त्वम्लरसा चोष्णा ग्राही च रुचिकारका ।

राजनामनिघण्टे च द्रव्ये वृष्या परा स्मृता ।।

...निघण्टु रत्नाकर

भेंडी किंचित उष्ण असते, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, रुचकर असते आणि वृष्य म्हणजे शुक्रधातुवर्धक द्रव्यांमध्ये श्रेष्ठ असते।

सौजन्य:ई-सकाळ

Saturday, June 27, 2009

आयुर्वेद:आरोग्यविषयक सर्व काही एका क्‍लिक वर

आरोग्यविषयक सर्व काही एका क्‍लिक वर

इंटरनेटवर आधारित मार्केटिंग करणाऱ्या "आयमार्केटिंग ऍव्हान्टेज'तर्फे www.JustHealth.in हे आरोग्यविषयक समग्र माहिती पुरवणारे संकेतस्थळ सुरू झाले आहे. लॉगिंग केल्यावर डॉक्‍टर्स, हॉस्पिटल्स आणि आरोग्याशी निगडित असणाऱ्या बाबींची माहिती या संकेतस्थळावर मिळू शकेल. या पोर्टलद्वारे माहिती मिळवू इच्छिणाऱ्यांना डॉक्‍टरांची सविस्तर माहिती त्यांच्याकडे जाण्याआधीच मिळू शकेल.

या संकेतस्थळाचा नुकताच प्रारंभ झाल्याने त्याची सेवा सध्या केवळ मुंबई आणि दिल्ली या दोन महानगरांनाच मिळणार आहे. पुढील काही महिन्यांतच इतर शहरांमध्येही ही सेवा पुरवण्यात येईल. वर्षभरात ही सेवा देशभर पुरवण्याचा आमचा मानस असल्याचे "आयमार्केटिंग ऍडव्हान्टेज'चे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन धवन यांनी सांगितले.

या हेल्थ पोर्टलचा उपयोग केवळ चांगल्या डॉक्‍टरांच्या शोधात असलेल्यांना किंवा रुग्णांनाच होईल असे नाही. तर गंभीर आजारासाठी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला हवा असणाऱ्या मंडळींनाही या संकेतस्थळाचा उपयोग होऊ शकेल. केवळ आपल्याच भागातले नव्हे तर इतर भागांतले तज्ज्ञही या संकेतस्थळावरून कळू शकतील. "एखाद्या डॉक्‍टरचा नावलौकिक ऐकला किंवा तशीच वेळ आली आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाला नेले, अशी सध्या लोकांची मानसिकता आहे. पण या संकेतस्थळाच्या माध्यमामुळे हा नजारा बदलून जाऊ शकेल. तज्ज्ञ आणि गरजेनुसार हॉस्पिटलची माहिती मिळणार असल्याने परिस्थितीत नक्कीच सकारात्मक बदल होईल,' अशी आशा या संकेतस्थळाचे प्रॉडक्‍ट मॅनेजर आयुष पाहुजा यांनी व्यक्त केली.

डॉक्‍टरांच्या नावावरून, त्यांच्या स्पेशलाइझेशनवरून, लोकेशनवरून आणि डॉक्‍टरांच्या प्रोफाइलचीही मिळणारी ही माहिती मोफत आणि अर्थातच 24 बाय 7 मिळू शकेल. भारतभरातील लाखांहून अधिक डॉक्‍टरांची आणि हॉस्पिटलांची यादी आणि विश्‍वसनीय अशी आरोग्याशी निगडित इतर सेवांची माहिती या संकेतस्थळावरून मिळू शकेल. डॉक्‍टर आणि हॉस्पिटलला पोहचण्यासाठी नकाशे आणि दिशादर्शक आकृत्यांचाही या संकेतस्थळावर समावेश करण्यात येणार आहे. शिवाय हेल्थकेअर डिरेक्‍टरी सर्व्हिस, आरोग्यविषयक लेख आणि बातम्या, औषधे, इन्शुरन्स आदी आरोग्याशी निगडित बाबी या पोर्टलवर असणार आहेत. लोकांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे निर्माण होणारी वेळेची समस्या सोडवण्यासाठी नोंदणीकृत सदस्यांसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट, पर्सनल हेल्थ केअर रेकॉर्ड ट्रॅकिंग, रिमाइंडर, ऍलर्ट सर्व्हिस, रुटिन चेकअप आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत।


सौजान्य:

ई-सकाळ

आयुर्वेद::मोर्निंग वाक्

हे शीर्षक वाचुन कुणीही – 'Oh not again' अशीच प्रतिक्रिया दील!. लवकर उठणे, (थंडीच्या दिवसात तर उबदार दुलईच्या कोषातून बाहेर पडायची नुसती कल्पनासुद्धा नकोशी वाटते), वजन, सक्ती, mind body fitness, निवृत्ती, वय, मनाचा प्रतिकार अशा अनेक भावना बहुतांशी लोकांच्या मनात या मॉर्निंग वॉकशी निगडीत असतात. मला मात्र सकाळच्या या फेरफटक्याने नेहमीच आकर्षित केलय. असं का बरं असावं? म्हणतात ना ‘The first impression is the lasting one’ - प्रत्येक गोष्टीचा आपल्या जीवनात आपल्याला आलेला पहिला अनुभव फार महत्वाचा ठरतो. तो जर सकारात्मक असेल, तर आपण तशा अनुभवांना अगदी सहज आनंदाने स्वीकारतो. माझे काहीसे तसेच झाले असणार.

माझ्या आयुष्यात मॉर्निंग वॉकला सुरुवात झाली ती आजोबांचा हात धरुन ... साडेतीन चार वर्षांची असल्यापासुन ... रोज सकाळी त्यांच्याबरोबर पुढेमागे बागडत आम्ही भाऊ-बहीण जात असू. त्यांच्या नित्यनव्या गोष्टी ऎकायला मिळण हे सर्वात मोठ आकर्षण. किती भव्य दिव्य वाटायचा उगवणारा सूर्य - चारी दिशा उजळून टाकणारी त्याची किरणे आमच्या बालमनाला अवाक् करुन टाकायची. 'आपली सगळी शक्ती तो सुर्यनारायण आपल्याला देतो', आजोबा सांगायचे. रोज नव्या वाटा आणि त्याबरोबर नवे अनुभव. पक्षी, प्राणी, झाडे-फुले प्रत्येकाची माहिती त्यांच्याकडून मिळायची. सगळ्यात पहिल्यांदा अनेक कोंबड्या आणि बदकांमध्ये पाहिलेली टर्की मला अजून आठवते! कोण आनंद झाला होता मला त्या दिवशी - एखादी नवीन अद्भुत गोष्ट पाहिल्याचा.
बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी मोठाले सिमेंटचे पाईप ठेवलेले असायचे. मी आणि माझा भाऊ त्यात गेल्याशिवाय रहायचो नाही. फिरायला जायच्या वाटेवरच आमच ते 'घर'होत! किती मजा येईल अशा घरात रहायला. आजोबा आम्हाला वेगवेगळ्या घरांबद्दल सांगायचे - सिमेंटची, लाकडाची, विटांची आणि बर्फाची घरं ... माझं मन त्या वेगवेगळ्या प्रदेशातल्या घरात बागडून यायचं. एक ना दोन ... अशा कितीतरी सुंदर आठवणी त्या सकाळच्या मंगलप्रहरांशी सांधलेल्या आहेत. पाऊस पडून गेल्यावर साचलेल्या पाण्यात पाहिलेल स्वत:चं 'प्रतिबिंब'हा आजोबांनी शिकवलेला नवा शब्द! दिवसभर मी तो घोकत होते. प्रेमातच पडले होते जणू त्याच्या की आपल्याच?

सुट्ट्यांमध्ये आम्हा चुलत आत्तेभावंडांची सकाळ आजोबांच्या मॉर्निंग वॉकने व्यापली जायची! टेकड्यांवरुन झाडाझुड्पातून मुंग्यांची वारुळं, किड्यांची मातीतली घरं, मधमाशांची पोळी, झाडांच्या फांद्यांवर त्यांच्या रंगात बेमालुमपणे मिसळून स्तब्ध पहुडलेले सरडे, सूर्य़प्रकाशात अवचित दृष्टीस पडलेल सुंदर कोळ्यांच जाळ ... निसर्गाची किमया आम्हाला थक्क करुन टाकायची! आजोबा आम्हाला पळसाची पान गोळा करायला सांगायचे - पत्रावळीसाठी कशी पाने हवीत, द्रोणांसाठी कोणती निवडायची - ती टाचण्यासाठी टाचण गोळा करायचं. घरी आल्यावर द्रोण, पत्रावळी बनवण्याचा प्रशिक्षण वर्ग भरायचा. वेड्या वाकड्या असल्या तरी स्वत: तयार केलेल्या पत्रावळीवरच्या जेवणाची चव औरच! दारातच मोठ प्राजक्ताच झाड होत. आजोबांबरोबर फिरून आल्यावर आम्ही सर्व मुलं घरातून रोळ्या आणून फुलं गोळा करायचो. 'टप टप पडती अंगावरती ...' चा अनुभव देणारे आजोबाच. गोळा केलेल्या फुलांच्या देवघरात रांगोळ्या काढ्ल्या जायच्या. रोज नवीन ... पारिजातकाच्या नाजुक फुलांच्या मंद सुवासाच्या आठवणी त्या मॉर्निंग वॉकशी जोडलेल्या आहेत ... पवित्र आणि सात्विक.

आश्चर्य म्हणजे या मॉर्निंग वॉकनी माझा आणि मी त्याचा पिच्छा कधीच सोडला नाही! शाळेतल्या मित्र मैत्रिणिंबरोबर सुट्ट्यांमधला तो आमचा अगदी आवडीचा कार्यक्रम असायचा! उन्हाळ्यात अंगावर सकाळचे गार वारे घेत आम्ही सर्व मंडळी घराजवळची टेकडी चढत असू. अगदी वर पोचल्यावर धावत खाली कोण आधी येतं ह्याची शर्यत लागत असे! त्या काळी सुट्ट्यांमधली प्रशिक्षण शिबीर संस्कारवर्ग नव्हते ... मुलांच्या मुक्त मनांना बांध घालायला! टेकडीवर उमलणारी ती रानटी सूर्यफुलं किती आनंदात डोलायची! एरवी रुक्ष दिसणाऱ्या त्या टेकडीवर या शेकडो फुलांच हे पिवळ जर्द पांघरुण कसं तयार होतं याचं आम्हाला नेहमीच कुतूहल वाटायचं. पुढे वर्ड्स्वर्थची Daffodils शिकताना त्याने रेखाटलेले चित्र मला सहज डोळ्यांपुढे साकारता आले!

शाळा कॉलेजात जरा बॅकसीटच घेतलेल्या माझ्या या दोस्ताशी परत भेट शिक्षण संपताच झाली ती वडिलांबरोबर. आपल्यापेक्षा वयानी जास्त असून ते इतक्या भरभर कसे चालू शकतात . मग त्यांनी धाप न लागता, न दमता झपझप चालायचे टेक्निक शिकवलं. कित्येक विषयांवर आमची देवाण घेवाण त्या वेळात होत असे. दोन पिढ्यांमध्ये संवाद साधायची किती सुंदर संधी या सकाळच्या फेरफटक्यामुळे मिळाली!

पुढे लग्न, संसार, मुले, नोकरी ही सगळ्यांच्या पदरी पडणारी कसरत मलाही चुकली नाही. पण गम्मत म्हणजे मुलं (जुळी!) अगदी लहान असताना दिवसभराची दमछाक, रात्रीची जागरणं या सगळ्यामुळे मरगळलेल्या शरीराला तजेला द्यायचा तो मॉर्निंग वॉकच! 'अहो, तुम्हाला वेळ तरी कसा होतो?' हा सगळ्यांना पडलेला प्रश्न! पण खरं सांगू ... त्या सकाळच्या वीस पंचवीस मिनीटांच्या (तेवढीच देऊ शकत होते) झपझप चालण्याने आणि त्याहूनही आधिक ती 'सकाळ'अनुभवल्याने शरीर आणि मन दिवस पेलायला फिट्ट व्हायच!

पुढे पुण्यात आलो ... सकाळच्या या फेरीत वेगवेगळ्या वळणांवरचे बहरणारे वृक्ष टिपायचा मला छंद जडला. ग्लिसरीडियाचे एरवी तापदायक वाटणारे रान आपल्या नाजूक फुलांनी बहरले की वसंत ऋतुची चाहुल लागायची मग जॅकरेंडा, बहावा आणि शेवटी गुलमोहोर! डोळे भरून ती रंगांची उधळण मनाच्या कप्प्यात साठ्वून घ्यायचे. सकाळच्या कोवळ्या उन्हात आधिकच खुलून दिसणारे ते रंग मग आपोआपच माझ्या जीवनातही उतरू लागायचे! ऋतुप्रमाणे आपली रूपं बदलणारे हे वृक्ष आपल्यासमोर एक रहस्य उलगडु पाहतात ... अविरत बदल हेच न बदलणार सत्य आहे!

नैसर्गिक सूर्यप्रकाश आणि त्याबरोबर अनुभवायला मिळणारे पहिल्या प्रहराचे गार मंद वारे, थंडीच्या दिवसात मिळणारी ऊब या सर्वांचा मनावर किती सकारात्मक परिणाम होतो हे प्रत्येकाने अनुभवायलाच हवे! हळुवारपणे जागा होणारा निसर्ग अनुभवा आणि पहा कसा चैतन्यमय होईल तुमचा सबंध दिवस! मला वाटतं, मॉर्निंग वॉकच्या शारीरिक फायद्यांवरच जास्त भर दिला जातो. पण सुदृढ शरीराबरोबरच कितीतरी पटीने जास्त सुद्रुढ मन तयार होतं त्यामुळे! औदासिन्य पळवून लावणारी सूर्याची किरणं मनात उत्साह, चैतन्य आणि हुरूप भरतात ... धरतीच्या कुशीतून डोकावणारा कोंब, दवबिंदू पेलत हळूच उमलणारी एखादी कळी आपल्याला एक नवी आशा दाखवते!

तर मित्रहो .. घेणार ना अनुभव या मॉर्निंग वॉकचा? अगदी चकटफू घेता येणाऱ्या या पॅकेजचे रिटर्न्स भरभक्कम आहेत ... after all,

What is life if full of care

You have no time to stand and stare...



सौजन्य :ई-सकाळ