Friday, July 3, 2009

Ayurved:अन्नयोग

रोजच्या आहारात असाव्यात अशा बऱ्याचशा फळभाज्यांचे गुणधर्म आपण पाहिले. आज आपण प्रकृती व दोषांचा विचार करून मग सेवन कराव्या अशा काही भाज्यांची माहिती पाहणार आहोत.

वांगे

वृन्ताकं स्वादु तीक्ष्णोष्णं पाके कटु च दीपनम्‌ ।

अपित्तलं लघु क्षारं शुक्रलं ज्वरनाशनम्‌ ।।

...निघण्टु रत्नाकर

वांगे चवीला गोड, स्वादिष्ट असले तरी गुणाने तीक्ष्ण असते, वीर्याने उष्ण असते, तसेच विपाकाने तिखट असते. पचायला हलके असले तरी क्षारयुक्‍त असते. थोड्या प्रमाणात खाल्ले तर पित्तकर नसते, शुक्रप्रवर्तक असते.

वांगे तीक्ष्ण, उष्ण व विपाकाने तिखट असल्याने रक्‍तदोष वा त्वचाविकार असणाऱ्यांसाठी अपथ्यकर असते, असा वृद्धवैद्याधार आहे.

ढोबळी मिरची

नावाप्रमाणे मोठी असणारी ही भाजी मिरचीचाच एक प्रकार आहे. चवीला तिखट, कडवट असणारी ही भाजी पित्त-वातकर असते. शरीरात रुक्षता वाढविणारी असते. त्यामुळे वाताचा त्रास असणाऱ्यांनी, आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्यांनी शक्‍यतो ही भाजी खाणे टाळणे उत्तम. त्वचाविकार असणाऱ्यांनी किंवा अंगावर पित्त उठण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनीही ढोबळी मिरची नियमितपणे खाऊ नये.

गवार

बाकुचीशिम्बिका रुक्षा वातला मधुरा गुरुः ।

सरा कफकारी चाग्निदीपनी पित्तनाशिनी ।।

... निघण्टु रत्नाकर

गवारीच्या शेंगा गुणाने रुक्ष, तसेच पचायला जड असतात. चवीला गोड असल्या तरी वातदोष वाढवणाऱ्या असतात. सारक असतात. कफ वाढवितात. कोवळ्या असताना योग्य प्रमाणात खाल्ल्या असता अग्निदीपन करतात व पित्तदोष कमी करतात.

गवारीच्या शेंगा जून झाल्या असता अधिकाधिक कोरडेपणा वाढवणाऱ्या होतात. त्वचारोगात, वातरोगात, मूत्रमार्गात जंतुसंसर्ग होण्याची प्रवृत्ती असताना गवार खाणे टाळणे चांगले.

घेवडा / फरस बी

ग्रामजा वातला रुच्या तुवरा मधुरा मता ।

मुखप्रिया कण्ठशुद्धिकारिणी ग्राहिणी मता ।।

... निघण्टु रत्नाकर

घेवडा वात वाढवतो. चवीला गोड-तुरट असून, रुचकर असतो. घेवड्याच्या कोवळ्या शेंगा कंठशुद्धी करण्यास मदत करतात. मलप्रवृत्ती बांधून ठेवण्यास मदत करतात. मात्र जून शेंगांमुळे पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

वाताचा त्रास असणाऱ्यांनी घेवडा काळजीपूर्वक खावा.

कोबी - फ्लॉवर

या भाज्यांचा ग्रंथात पक्का उल्लेख सापडत नाही, पण या भाज्यांच्या सेवनामुळे पोटात वायू धरतो, असा अनेकांचा अनुभव असतो. मूत्रासंबंधी काहीही तक्रार असताना या भाज्या अपथ्यकर ठरतात. आकार मोठा व्हावा म्हणून वापरली जाणारी खते, पानांना कीड लागू नये म्हणून वरून फवारली जाणारी रासायनिक द्रव्ये यांचा परिणाम या भाज्या धुतल्या, शिजवल्या तरी जाऊ शकत नाही. शिवाय या प्रकारच्या अनैसर्गिक प्रक्रियेतून तयार झालेले कोबी, फ्लॉवर निःसत्त्वही असतात. म्हणून सहसा बाजारात मिळणारे मोठ्या आकाराचे व सहज कीड लागू शकणारे कोबी- फ्लॉवर अपथ्यकर समजावे लागतात.

भूमिछत्र - मश्रूम

आजकाल मश्रूम खूप प्रचलित झाल्याचे दिसते. आयुर्वेदाच्या ग्रंथात मश्रूमला "भूमिछत्र' म्हटलेले आहे.

सर्वे संस्वेदजाः शीता दोषलाः पिच्छिलाश्‍च ते ।

गुरवश्‍छर्द्यतीसार- ज्वरश्‍लेष्मामयप्रदाः ।।

... भावप्रकाश

सर्व प्रकारचे मश्रूम दोषवर्धक, बुळबुळीत, चिकट असतात. ते पचायला जड असून त्यामुळे उलटी, जुलाब, ताप किंवा इतर कफविकार उत्पन्न होऊ शकतात. त्यातल्या त्यात स्वच्छ ठिकाणी उगवलेले मश्रूम थोडे कमी दोषकारक असतात. जमिनीवर, लाकडावर, झाडावर, तसेच गोमयाच्या ढिगावर मश्रूम उगवतात, असाही उल्लेख भावप्रकाशात आहे. काही मश्रूम विषारीही असतात. खाण्यास योग्य मश्रूम पारखून घेणे आवश्‍यक असते. कारण मश्रूममध्येही चिकटपणा, जाडपणा वेगवेगळा असतो.

एकंदरच मश्रूममुळे ताकद मिळत असली तरी ते एक प्रकारचे जडान्न असल्याने अपथ्यकरच समजले जातात.

शेवग्याच्या शेंगा

शेवग्याच्या शेंगांची भाजी करण्याची पद्धत नसली तरी आमटीत, पिठल्यात शेवग्याच्या शेंगा टाकणे पथ्यकर असते.

शिम्बी चास्याग्निदीपनी ।

तुवरा स्वादु मधुरा कफपित्तज्वरक्षयान्‌ ।

कुष्ठशूलश्‍वासगुल्मनाशिनी च प्रकीर्तितः ।।

... निघण्टु रत्नाकर

शेवग्याच्या शेंगांमुळे अग्नीचे दीपन होते. चवीला स्वादिष्ट असणाऱ्या या शेंगांमुळे कफ-पित्तदोषाचे शमन होते. क्षयरोग, ताप, त्वचारोग, शूल, दमा, गुल्म वगैरे व्याधींमध्ये शेवग्याच्या शेंगा हितकर असतात.

एकंदर वजन कमी करण्याची इच्छा असणाऱ्यांनी, जंत होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश करणे चांगले असते.

शेवग्याच्या फुलांचीसुद्धा भाजी केली जाते. ती डोळ्यांसाठी विशेष उपयुक्त असते.



अन्नयोग - कंद

आपल्या आहारात कंद हवा. मग ते गाजर असो वा सुरण; बटाटा असो वा रताळे. मात्र आपल्या आहारातील कंदाचे पथ्यापथ्य समजून घेऊन त्याची निवड करा.

आपण आत्तापर्यंत फळभाज्या तसेच पालेभाज्यांची माहिती घेतली. आज आपण कंद स्वरूपात तयार होणाऱ्या भाज्यांची माहिती घेणार आहोत.

सुरण

उपवासासाठी चालणाऱ्या काही मोजक्‍या भाज्यांमध्ये सुरणाचा अंतर्भाव होतो. सुरणाचे कंद खूप मोठे असू शकतात.

सुरणो दीपनो रुक्षः कषायः कण्डुकृत्‌ कटुः ।

विष्टम्भी विशदो रुच्यः कफार्शः कृन्तनो लघु ।

विशेषात्‌ अर्शने पथ्यः प्लीहगुल्मविनाशनः ।।


...भावप्रकाश

सुरण चवीला तुरट असतो, विपाकाने तिखट असतो. इतर सर्व कंदमुळांपेक्षा पचायला सोपा असतो. सुरण अग्निदीपन करतो, रुक्षता वाढवतो, तसेच अवष्टंभकर असतो. कफज मूळव्याधीत विशेष पथ्यकर असतो. प्लीहा वाढणे, गुल्म तयार होणे वगैरे व्याधींत हितकर असतो.

सुरणामध्ये खाज निर्माण करण्याचा दुर्गुण असतो. तो घालविण्यासाठी सुरणाचे तुकडे चिंचेच्या पाण्याने धुतले जातात किंवा चिंचेच्या पाण्यासह उकळायचे असतात.

सुरण वाफवून तयार केलेली भाजी मूळव्याधीमध्ये, विशेषतः कंड सुटणाऱ्या मूळव्याधीमध्ये हितकर असते. मात्र त्वचारोगात तसेच रक्‍तपित्तामध्ये सुरण अपथ्यकर समजले जाते.

बटाटा

काहींच्या मते बटाटा ३००-४०० वर्षांपूर्वी भारतात आला. आयुर्वेदात पिण्डालुक, आलुक, रक्‍तालु वगैरे अनेक प्रकारचे कंद वर्णन केलेले आहेत, तसेच आलुकाचे सामान्य गुणही वर्णन केलेले आहेत. हे बटाट्याला चपखल बसणारे आहेत.

आलुकं शीतलं सर्वं विष्टम्भी मधुरं गुरु ।

सृष्टमूत्रमलं रुक्षं दुर्जरं रक्‍तपित्तनुत्‌ ।

कफानिलकरं बल्यं वृष्यं स्वल्पाग्निवर्द्धनम्‌ ।।


...भावप्रकाश

सर्व प्रकारचे आलुक म्हणजे बटाटे वीर्याने थंड असतात, चवीला गोड असतात, पचायला जड असतात, मल-मूत्र होण्यास सहायक असतात, कफकर तसेच वातकर असतात. रक्‍तदोष, पित्तदोषात हितकर असतात, ताकद वाढवतात, शुक्रधातू वाढवतात व काही प्रमाणात अग्निसंदीपन करतात.

या ठिकाणी बटाटा वातकर सांगितला असला तरी तो उकडून मिरी, जिरे, आले वगैरेंसह खाल्ला तर वात वाढताना दिसत नाही. तळलेल्या बटाट्यामुळे मात्र वात वाढू शकतो. अग्नी मंद असताना बटाटा खाल्ला, तर पचनसंस्थेत थोडा वात वाढताना दिसला तरी बटाट्यामुळे चवळी, वाटाणा, चण्याप्रमाणे वात वाढत नाही, असा अनुभव आहे.

रताळे

आयुर्वेदात रक्‍तालु नावाने ओळखले जाणारे रताळेही उपवासासाठी चालते.

आलुकी बलकृत्स्निग्धा गुर्वी हृत्कम्पनाशिनी ।

विष्टम्भकारिणी तैले तलिता।तिरुचिप्रदा ।।


...भावप्रकाश

रताळे स्निग्ध असते, ताकद वाढवते, पचायला जड असते, हृदयाची धडधड कमी करते, मलावष्टंभ करू शकते व तळून खाल्ले असता खूप रुचकर लागते.

रताळे उकडून खाणे चांगले असते; मात्र भूक न लागणाऱ्या व्यक्‍तींनी रताळे विचारपूर्वक खावे. प्रमेह, मधुमेह, स्थूल व्यक्‍तींनीही रताळे शक्‍यतो टाळावे.

गाजर

गृज्जनं मधुरं तीक्ष्णं तिक्‍तोष्णं दीपनं लघु ।

संग्राहि पक्‍तपित्तार्शो ग्रहणीकफवातजित्‌ ।।


...भावप्रकाश

गाजर चवीला गोड असले तरी गुणाने उष्ण-तीक्ष्ण असते, अग्नी प्रदीप्त करते, पचायला हलके असते, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते. गाजर पित्तज मूळव्याध, संग्रहणीमध्ये पथ्यकर असते, तसेच कफदोष व वातदोषात हितकर असते.

गाजराचा कोशिंबीर म्हणून वापर करणे चांगले असते. त्यातही ते शिजवून खाणे अधिक चांगले असते. मात्र आजकाल रूढ होत असलेली गाजराचा रस पिण्याची पद्धत चांगली नाही. कारण त्यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते, त्वचारोग बळावतात, मलावष्टंभ होऊ शकतो.

डॉ. श्री बालाजी तांबे

No comments:

Post a Comment