Wednesday, September 2, 2009

महत्वपूर्ण दूध

लहानपणापासून मातृ-दूध व गाईचे दूध घेतल्यास पुढच्या आरोग्याचा पाया भक्कम तयार होतो. पण अलीकडच्या काळात दूधदुभते न मिळाल्यामुळे माणसाला आरोग्य पारखे झालेच; पण त्याचबरोबर चुकीचे दूध सेवन केल्यामुळे अनेक प्रकारचे रोग दिसू लागले आहेत.

अ लीकडे लोकांना चरबी वाढण्याची भीती वाटू लागली. वजन वाढेल या भीतीमुळे अनेकांनी दूधदुभत्याकडे वाकडी नजर केली, तरी ठिकठिकाणच्या शिवमंदिरांत महादेवावर दुधाचा अभिषेक मात्र चालू राहिलेला दिसतो. पाऊस पडला नाही म्हणून महादेवाच्या मंदिराचा गाभारा पूर्णपणे दुधाने भरायचा असे सर्व गावकऱ्यांनी ठरविले व दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या आधी सर्वांनी एक एक लोटा दूध गाभाऱ्यात ओतायचे हे पण ठरले. अशा प्रकारे महादेवाला संकटात टाकले, की पाऊस येईल ही सर्वांची अपेक्षा होती. ठरलेल्या दिवशी पुजाऱ्याने दुधात बुडालेला महादेव दिसेल अशा अपेक्षेने सर्वांच्या उपस्थितीत पहाटे मंदिर उघडले, तेव्हा दिसले, की महादेव पाण्यात बुडालेला आहे. पूर्ण गाभारा पाण्याने भरलेला आहे. सर्व जण दूध टाकणार आहेतच, आपण एक लोटा पाणी टाकले, तर फार काही बिघडणार नाही असा विचार सर्वांनी केला व सर्वांनीच एक एक लोटा पाणी टाकले होते.

एकूण काय तर दुधात पाणी टाकायचे वा पाण्यासारखे दूध प्यायचे ही सवय लोकांना फार पूर्वीपासून लागली असावी. दुधात बोट घालून वर काढल्यावर बोट पांढरे दिसावे, म्हणजे बोटाला सर्व बाजूंनी दूध चिकटले तर ते दूध चांगले असते. साधारण दुधात ४-४.५ टक्के फॅट असली, तर ते दूध चांगले मानले जाते. दुधाचे भाव तर वाढत राहिले आहेतच; पण दुधातील फॅटचे प्रमाण कमी होत होत दोन टक्‍क्‍यांवर आलेले आहे. त्यामुळे दूध तापवल्यावर त्यावर पातळ कागदासारखी साय येते असे दिसते. लोक असेच दूध सेवन करू लागल्याचे दिसते. अधिक प्रमाणात फॅट असलेले दूध प्रकृतीला अहितकर असते; कारण त्यामुळे शरीरातील चरबी वाढते, असा सोईस्कर गैरसमज रूढ होऊ लागला. दूध नसलेले पांढरे पाणी वा पावडर (नॉन डेअरी प्रॉडक्‍ट्‌स) टाकल्यावर चहाला रंग आणण्याची शक्कल काही मंडळींनी शोधून काढली. प्रतिष्ठित पंचतारांकित हॉटेलमध्ये वा विमानप्रवासात असे नॉन डेअरी प्रॉडक्‍ट्‌स दिले जाऊ लागल्यावर काही मंडळींनी रसायने वापरूनच दूध बनविण्याचा प्रयत्न सुरू केला. या सर्वांमुळे चहाला पांढरा रंग येण्याआधी डोळे पांढरे होण्याची वेळ आली. अशी परिस्थिती आल्यावर मात्र लोकांचे डोळे उघडले. हे दूधदुभत्याचे काय नाटक सुरू आहे हे भगवानच जाणे.

ज्या वेळी ताजे दूध मिळत असे, त्या दुधावर बोटभर जाडीची साय येत असे. जेव्हा लोक लस्सी जाड मलई टाकून घेत असत, मलईचे श्रीखंड, मलईचा खवा, मलईचे पेढे व कणीदार तूप खात असत तेव्हा माणसे धष्टपुष्ट होती, रोगही त्यामानाने सोपे होते. मथुरा, वृंदावन या बाजूला सकस दुधाचा एवढा छान व्यापार होता, की त्या दुधावर पोसलेले मल्ल रस्त्यातून जाऊ लागल्यावर हल्ली एखादा भारी वजन असलेला ट्रक रस्त्यातून गेला, की घरात जसा अनुभव येतो तसा अनुभव येत असे. आता ते दूधदुभते गेले व मल्लही गेले. आज रोगांचे प्रमाण अतोनात वाढलेले दिसते. औषधपाण्याच्या खर्चाने ट क्कल पडेल असे वाटत असले, तरी दूधदुभत्याचा अभाव हेच टक्कल पडण्याचे मुख्य कारण आहे. ताज्या दुधाबाबत एक अडचण असते, की काढल्यावर काही तासांच्या आत ते तापवावे लागते, अन्यथा ते नासते. त्यामुळे पहाटे उठून गाई-म्हशींचे दूध काढायचे व गिऱ्हाइकांना पुरवायचा हा एक मोठा द्राविडी प्राणायाम असतो. पूर्वी ताजे दूध बाटल्यांतून येत असे तेव्हा सकाळी लवकर उठून दूध केंद्रांवरून दूध आणून लगेच तापवणे हे एक नित्याचे काम असे. कपडे धुवायला मशिन, कणीक मळायला मशिन, जिना चढायला लिफ्ट अशा सर्व सुविधा उपलब्ध झाल्या तसतसे लोकांना सकाळी उठून दूध आणायला जाणे अवघड होऊ लागले. शहरांची अतोनात वाढ झाल्यामुळे गाई-म्हशी राहत्या वस्तीपासून दूरवर गेल्या, पर्यायाने दूधदुभतेही माणसापासून दूर गेले. त्यामुळे दूध अधिक कसे टिकेल याचे प्रयत्न होऊ लागले. महिनोन्‌ महिने न तापवता खोक्‍यात टिकणारे दूध तयार झाले; पण हेच दूध सेवन केल्यावर महिनोन्‌ महिने न पचता पोटात राहू लागले. कच्च्या दुधावरचे क्रीम काढून घेऊन त्यापासून पुढे सर्व पदार्थ बनवून सामान्यांना उपलब्ध करून देणे हा व्यवसाय सुरू झाला. दुधाचा महापूर आल्यासारखे वाटले, तरी सामान्यांना खरे दूधदुभते दुर्मिळ झाल

े. उपलब्ध असलेल्या दुधाचा शरीराला काडीमात्र उपयोग राहिला नाही.

दुधात प्राणिज एन्झाईम्स असल्याने दूध वाळवणे खूप अवघड असते; पण काही विशिष्ट पद्धतीने दुधाची पावडर बनवणे सुरू झाले. या दुधाच्या पावडरपासून बनविलेले दूध पचणे अवघड असते. दूध तापवून वेगळ्या केलेल्या सायीला विरजण लावून लोणी व त्यापासून तूप बनविणे ही खरी लोणी व तूप बनविण्याची भारतीय पारंपरिक पद्धत आहे. दही बन विण्यासाठी वापरलेला संस्कार म्हणजे विरजण प्राणिज बॅक्‍टेरिया असलेले असणे आवश्‍यक असते. दूध-तुपाची शुद्ध म्हणून जाहिरात केली गेली व ते तसे असले तरीही मुळात बनविण्याच्या प्रक्रियेची शुद्धता पाळणे टाळले जाऊ लागले. गुरांना भलतेच खाद्य देणे, नंतर दूध थोडेसे तापवून क्रीम काढून घेणे, त्या क्रीमवर प्रक्रिया करून लोणी-तूप वगैरे बनविणे हेच मुळात चुकीचे व अशुद्ध म्हणावे लागेल. या सर्व क्रिया रासायनिक पद्धतीने सुरू झाल्या, ज्यामुळे सर्व प्रक्रिया चटकन होऊ लागल्या व त्यापासून बन विलेल्या लोणी-तुपाचे दुर्गुणही लक्षात येईनासे झाले; पण असे पदार्थ सेवन केल्यावर त्याचे दुष्परिणाम होणे अटळ होते.

दूधदुभते न मिळाल्यामुळे माणसाला आरोग्य पारखे झालेच; पण त्याचबरोबर चुकीचे दूधदुभते सेवन केल्यामुळे अनेक प्रकारचे रोग दिसू लागले. खाल्लेल्या अन्नाचे शक्‍तीत रूपांतर होईपर्यंत जी सप्तधातूंची वाढ होणे अपेक्षित असते ती वाढ न होता, असंतुलन होऊन रोग वाढीला लागले. रोगांची लक्षणे दूर होतील अशी औषधे शोधली गेली; पण रोग आटोक्‍यात येईनासे झाले. लहानपणापासून मातृ-दूध व गाईचे दूध घेतल्यास पुढच्या आरोग्याचा पाया भक्कम तयार होतो. पायाच भक्कम नसेल म्हणजे शरीर, हाडे, शुक्र वगैरे कमकुवत राहिली, तर शरीररूपी इमारतीला डागडुजी करून त्या घरात शांतपणे राहता येणार नाही.

डॉ. श्री बालाजी तांबे

No comments:

Post a Comment